महाराष्ट्रातील सर्प -विषारी, निमविषारी, बिनविषारी फोटो आणि सर्व माहिती



 महाराष्ट्रातील सर्प -विषारी, 
निमविषारी, बिनविषारी फोटो आणि सर्व माहिती 

साधा साप दिसला की तो मारायचा.हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यानपिढ्या मिळाली आहे.साप ही जमात मानवाच्या अप्रचाराने बदनाम झाली आहे.. विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो.त्याच्या या अज्ञानातूनच साप मारले जातात..सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो.

साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की ठेचला जातो.असे हजारो साप भारतात रोज मारले जातात.हे पाहून असं वाटतं की आपण आपल्याच पायावर कुर्‍हाड मारायचे काम करतो.

साप  शेतकर्‍यांचा मित्र आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यांपैकी सुमारे 27% धान्य उंदीर खातात किंवा त्याची नासाडी करतात. सापाच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने उंदीर व घुशी या कृंतक गणातील प्राण्यांचा समावेश होतो. साप उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. धामण एका वर्षात सुमारे 250 उंदीर खाते. उंदराच्या एका जोडीपासून साधारणतः दरवर्षी सुमारे 888 पिले होतात यावरून उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी सापाचे महत्त्व लक्षात येते. मित्र आहे.  विविध औषधांमध्ये सर्पविष हे औषध म्हणून वापरले जाते.

जगामध्ये सुमारे 3000 प्रकारचे साप आढळतात. भारतात त्यापैकी 278 जाती सापडतात.त्यात काही विषारी आहेत, काही सौम्य विषारी; तर बहुसंख्य बिनविषारी आहेत. आपण एकदा जर हे विषारी साप ओळखायला शिकलो आणि स्वतः त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहिलो तर स्वतःला सहज वाचवता येतं..

“जोपर्यंत तुम्ही एखाद्या प्राण्याला दुखवत नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो प्राणी तुमच्यावर हल्ला करीत नाही.”

त्याला साप सुद्धा अपवाद नाही. मात्र या जीवसृष्टीत माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो विनाकारण स्वतः बरोबर इतरांनाही त्रास देतो आणि स्वतःवर नको ती संकटं ओढवून घेतो.

*सापांचे अन्न –
                    सापांना मेलेले भक्ष्य खाणे आवडत नाही. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात. काही साप झाडावरील घरट्यांमध्ये असलेली पक्ष्यांची अंडी खातात. सापांच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्वतःपेक्षा मोठ्या आकारमानाचे प्राणीही गिळू शकतात. नाग व घोणस यांसारखे विषारी साप भक्ष्याला पकडतात, त्यास दंश करून ठार मारतात. धामण व पाणसाप भक्ष्य पकडतात आणि ते जिवंत असतानाच गिळून टाकतात. ते डोक्याकडून भक्ष्य गिळतात. अजगरासारखे बिनविषारी साप दबा धरून बसतात. भक्ष्य जवळ आले की, त्यावर झडप घालून पकडतात आणि त्याच्याभोवती घट्ट वेटोळे घालून त्यास ठार मारतात. सापाला एकदा अन्न मिळाले की, त्याला काही दिवस अन्नाची गरज भासत नाही. काही साप अन्नपाण्याशिवाय कित्येक महिने जिवंत राहू शकतात. नागराज व मण्यार हे इतर सापांनादेखील अन्न म्हणून खातात


*सापाच्या विषावरून प्रकार*

( विषारी, निमविषारी,बिनविषारी )

महाराष्ट्रात एकूण 52 जातीचे साप आढळतात. त्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके साप विषारी आहेत.

नाग, मण्यार, घोणस, फुरसे  हे चार  विषारी साप प्रामुख्याने आपल्या सभोवती आढळतात.यानंतर काही निमविषारी आणि राहिलेले सगळेच बिनविषारी म्हणजे ज्यांच्या चाव्यानंतर आपल्याला मृत्यू येत नाही. या सापांना आपण बिनविषारी म्हणतो. उदाहरणार्थ धामण, गवत्या, तस्कर, अजगर, मांडूळ, दिवड, पट्टेरी पान सर्प, कुकरी इत्यादी.

यानंतर विषारी आणि बिनविषारी यामध्ये मोडणारा सापांचा एक गट आहे त्याला निमविषारी साप म्हणतात. की जे चावले असता आपल्याला फक्त झोप येते 5 ते 6 तास. यांना निमविषारी असे म्हणतात. उदा. हरणटोळ व मांजर्‍या हे दोन साप या प्रकारात मोडतात.

 विषारी सर्पांची त्यांच्या विषाच्या परिणामानुसार दोन प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे.

१) न्यूरोटॉक्सिक (मज्जासंस्थेवर परिणाम करणारे)

२) हिमोलॅटिक (रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे)



*विषारी साप*

भारतातील  चार प्रमुख विषारी साप  आढळतात . नाग, घोणस ,मण्यार  आणि फुरसे .

( नागराज हा सर्वत्र आढळत नाही .)

*1.नागराज किंवा किंग कोब्रा* – 


                                        नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतु मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पूर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.

*2. नाग*- (cobra) – 

                                           
                                       डिवचताच किंवा धोका वाटताच फणा काढून उभे राहतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच सगळ्या सापांपेक्षा या सापाच्या बद्दल जास्त अंधश्रद्धा आहेत. त्याचे विष हे मज्जासंस्था म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियावर परिणाम करणारे आहे. भारतातील दोन नंबरचा विषारी साप आहे..याची मादी एक वेळेस 8 ते 10 अंडी घालते.

              *गैरसमज *
नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत.
  • नाग दूध पितो – वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही.
  • नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो – वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
  • नागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो. (या सूडाला डूख धरणे असे म्हणतात.)
  • नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो.
  • नागाला अनेक फणे असू शकतात.


*3. मण्यार*- (Common Krait ) – 

                                              हा साप भारतातील एक नंबरचा विषारी आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करणारे आहे. हा रात्रीचा बाहेर पडतो. निळसर काळ्या अंगावर पांढरे आडवे पट्टे किंवा ठिपके असतात. ते शेपटीकडे गर्द होत जातात. हा साप नागपेक्षा 15 टक्के जास्त विषारी आहे. याची मादी एका वेळेस 6 ते 8 अंडी घालते.मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.  मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

*4. घोणस* (Russel’s viper) – 

                                                   भारतातील सर्वांत जास्त मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा साप. धोका जाणवताच कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढून स्वतःचे अस्तित्व दाखवतो.अंगावर रुद्राक्षाच्या माळेची डोळ्यापासून शेपटीपर्यंतची रचना.शेपटी आखूड व तोंड त्रिकोणी मोठे.रक्तावर परिणाम करणारे विष.या सापाची साधारण 4 फुटांपर्यंत वाढ होते. बर्‍याचदा लोक त्याला अजगर समजतात. याची मादी एक वेळेस 60 ते 65 पिल्लांना जन्म देते. सगळी पिल्ले जन्मल्यावर दोन तासात त्यांना विषाची तीव्रता जास्त असते. त्यांचे विष हे रक्तावर परिणाम करणारे आहे.

*5. फुरसे*-(saw scaled viper) –

                       हा सर्प लांबीला जास्तीत जास्त एक फूट, अंगावर खवले, डोक्यावर बाणाचे चिन्ह. डिवचला असता किंवा धोक्याची चाहूल लागताच हा शरीर एकमेकांवर घासून आवाजाची निर्मिती करतो व एक प्रकारे आपल्याला सूचना देत असतो. जवळ येऊ नये अशी.याचे विष हे रक्तविष आहे. साधारण माळरानावर, दगडाखाली राहणे याला आवडते. विंचू, पाली, सरडे हे याचे खाद्य आहे. एक वेळेस 6 ते 10 पिल्लांना हे जन्म देतो. हा भारतात सर्वत्र आढळतो. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.या प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.

हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत. याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.


*निमविषारी साप-*

*1.हरणटोळ ( green vine snake) –


                            हा साप हा पूर्ण पाने झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किव्वा फांद्यांवर दिसून येतो, हरणटोळ हा केवळ एकाच हिरव्या रंगात सापडत नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अश्या मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो,पोपटी/ हिरव्या रंगाचा हा साप झाडावर वास्तव्य करतो. तोंड निमुळते; तसेच शरीराच्या मानाने शेपटी लांब व सडपातळ असते. यालाच काही भागामध्ये टाळूफोड्या साप असे म्हणतात. कारण हा झाडावरून जर माणसाला चावला तर प्रथम माणसाचे डोकेच त्याला दिसते व धक्का लागला तर शरीराच्या डोक्याला म्हणून हा डोक्याला चावतो हा टाळू फोडतो, ही एक अंधश्रध्दा आहे. झाडावरील पाली, सरडे, पक्षी खाणारा हा साप आहे. मानवाला चावल्यास माणूस 6 ते 8 तास शांत झोपतो.हरणटोळ हा मध्यम विषारी साप आहे, त्याचे विष छोट्या छोट्या भक्ष्यांवरच जास्त परिणामकारक ठरते. जरी त्याच्या चाव्याने माणसाचा मृत्यू होत नसला तरी त्याच्या चावण्या पासून लहान मुलगा आजारी पडू शकतो

*2. मांजर्‍या साप*

                                                  त्रिकोणी मानेवर स्पष्टपणे विस्तृत. “वाय” किंवा गामाच्या आकाराचे विशिष्ट चिन्ह हे वैशिष्ट्य आहे.या सापांचे डोळे मांजरासारखे बटबटीत असल्याने त्याला ‘मांजऱ्या’ नाव पडले. त्यांची जीभही लांब असते. हा अंगाने सडपातळ असतो. त्यांचे शरीर व शेपटीही त्यामानाने लांब असते. शेपटी निमुळती होत होत शेवटी ती अत्यंत बारीक झालेली असते.मांजऱ्या साप व फुरसे यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे या सापांनाही फुरसे समजण्याची अनेकदा गल्लत होते. मांजऱ्या हा जाड फुरशापेक्षा लांब व सडपातळ असतो.पडकी घरं, वाडे, झाडी यामध्ये वास्तव्य पाली, उंदीर, पक्षी खाऊन हा साप राहतो. शरीरभर v आकाराची नक्षी असते. डिवचल्यास आक्रमकपणे चावतो. शेपटीची हालचाल सारखी ठेवतो. भक्ष्याच्या शोधात बहुधा तो रात्री बाहेर पडतो. हा साप अंडी घालतो. चावला असता माणूस 4 ते 6 तास झोपतो. 

*बिनविषारी साप:*

भारतात 278 जातीचे साप आढळतात. त्यापैकी फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतके म्हणजे 3 टक्के साप हे विषारी आहेत; बाकीचे राहिलेले सर्व साप हे बिनविषारी आहेत. 15 सेंटिमीटर लांबीचा लहानात लहान वाळा साप ते 11 मीटर लांबीचा अजगर साप.

ठराविक बिनविषारी सापाची नावे पाहा. वाळा, चंचू वाळा, खापरखवल्या अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, तस्कर, धामण, धूळनागीण, चिगांग नायकुळ, कुकरी साप, कवड्या, काळतोंड्या, नानेटी, गवत्या, पानदिवड इत्यादी.


*1.अजगर, (Rock Python)

                       
                            आपल्या सर्वाना माहित असलेला हा साप म्हणजे अजगर . हा सुद्धा बिनविषारी असतो . याची लांबी ९ ते २४ फुटांपर्यंत वाढते . यांचे वास्तव्य संपूर्ण भारतात आहे . यांचे खाद्य म्हणजे उंदीर , घूस , मांजर , कोंबड्या , माकड , कुत्रे इत्यादी.

*2.धामण (Indian Rat Snake) :-


                           धामण सापाला शेतकर्याचा मित्र समजले जाते . धामण अत्यंत चपळ असते . धामण साप शेतात उंदरांचे बिळ , गवताळ, डोंगराळ प्रदेशात,वस्तीजवळराहतात भक्ष्याच्या शोधात ग्रामीण वस्तीत किंवा बागांमध्ये सुद्धा आढळून येतात.उंदीर, बेडूक , सरडे, छोटे पक्षी , बेडूक आणि वटवाघळे असे ह्याचे भक्ष्य असते. धामिण पिवळी , काळसर तपकिरी , शेवाळी या रंगछटांमध्ये आढळते . धामीणीचे डोळे मोठे आणि गोल बाहुल्या असतात . अंगावर जाळीदार नक्षी असते हि नक्षी शेपटीच्या भागाकडे स्पष्ट दिसते . यांची लांबी ६ ते ११ फुटांपर्यंत होते.

*3.तस्कर Common Trinket Snake :-


              तस्कर हा साप दिसायला नक्षीदार असतो . तपकिरी किंवा शेवाळी शरीरावर आडवे पट्टे असतात . ह्या सापाची अजून एक प्रजाती आढळून येते ती म्हणजे पहाडी तस्कर. तस्कर आणि पहाडी तस्कर यांची नक्षी वेगवेगळी असते .याला ओळखण्याची खून म्हणजे याची अलंकारी नक्षी आणि डोळ्यांच्या मागे असलेली काळी रेष . हा साप पक्ष्यांची अंडी किंवा पिले खाण्यासाठी झाडावर सुद्धा चढतो . यांची लांबी ५ फुटापर्यंत वाढू शकते. संपूर्ण भारतात हा साप आढळून येतो.

*5.गवत्या (Green keelback snake) :-


                                गवतात राहणारा म्हणून ह्याला गवत्या किंवा हिरवा दिवड असे म्हणतात . याची ओळख म्हणजे संपूर्ण हिरवे शरीर (लहान असताना डोक्याजवळ मानेवर काळ्या रंगाची इंग्रजी व्ही अक्षरासारखी पट्टी असते असेच पांढरे काळे पट्टे शरीरावर शेपटीपर्यंत पुसट होत जातात ) जसजसे हे साप मोठे होतात तसे ह्याच्या शरीरावरील सर्व पट्टे आणि खूण नाहीसे होतात. बेडूक ह्या सापांचे मुख्य खाद्य आहे कधीकधी क्वचित प्रसंगी पाली , सरडे सुद्धा खातात. यांची वाढ ३ फुटापर्यंत होते. साप विषारी नसला तरीही यांचा चावा दाहक असतो.

*6.वाळा सर्प Worm snake :-

                                         अत्यंत शांत स्वभावाचा हा सर्प मानवास कोणत्याही प्रकारची हानी पोहचवत नाही . याचे शरीर लालसर तपकिरी रंगाचे असते आणि शेपूट टोकेरी याचा वापर ते ओली जमीन उकरण्यासाठी करतात . हे साप पावसाळ्यात जमिनीवर येतात व इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतात . मुंग्या , वाळवी , अळ्या आणि इतर कीटकांची अंडी हे यांचे खाद्य .

*7.चित्रांग नायकूळ Slender Racer :-

                     नक्षीदार असलेला हा साप अतिशय सडपातळ आणि लांबलचक असतो. शरीर राखाडी तपकिरी रंगाचे त्यावर काळ्या दुहेरी पट्ट्या व यांमध्ये पिवळी किंवा पांढरी छट असते .याच पट्ट्या शेपटीकडे पुसट होत जातात . डोक्याकडे इंग्रजी व्ही अक्षरा सारखी खूण . हा साप अत्यंत शांत स्वभावाचा असतो . यांचे खाद्य सरडे , सापसुरळी इत्यादी . यांची वाढ ३ फुटांपर्यंत होते .

*8.नानेटी buff striped keelback :-

                                या सापाला सीतेची लट या नावाने सुद्धा ओळखतात . याची ओळख म्हणजे याच्या तपकिरी रंगावर डोक्यापासून शेपटीपर्यंत दोन्ही बाजूने पिवळ्या रंगाच्या रेषा . डोळ्यामागे डोक्याच्या दोन्ही बाजूला काळ्या रेषा असतात . पोटाकडील आणि तोंडाकडील खवले पिवळे असतात . याचे अजून एक वैशिष्ट्य असे कि यास धोक्याची जाणीव झाल्यास खवल्यांच्या खालील लाल आणि निळा रंग दाखवतो . सरडे , बेडूक, उंदीर हे यांचे खाद्य . गवताळ भागात , भातशेतीत, दमट आणि ओलसर जागी राहणे पसंत करतो .

*9.मांडूळ red sand boa :-

                             हा साप आकाराने दंडगोलाकार आणि लालसर गडद तपकिरी रंगाचा असतो . याची तोंड आणि शेपूट एकसारखे दिसत असल्या कारणाने त्याला दुतोंड्या सुद्धा म्हटले जाते . यांची लांबी २ ते ३ फुटांपर्यंत वाढते . नवजात असताना पिलांच्या शरीरावर काळ्या रंगाचे गोल चट्टे असतात , कालांतराने ते नाहीसे होतात . उंदीर , पाली , छोटे पक्षी हे याचे मुख्य खाद्य . अंधश्रद्धेपोटी ह्या सापाची तस्करी केली जाते . ह्याच्या कातडी साठी यांना मारले जाते .

*10.कुकरी सर्प Banded kukri snake :-


               ह्या सापाचा स्वभाव अत्यंत शांत आणि हा साप सहसा चावत देखील नाही. ह्या सापाची लांबी १-२ फूट इतकी होते . ह्यांच्या दातांची रचना कुकरी या हत्यार प्रमाणे असतात त्यामुळेच हे नाव पडले असावे . ह्याचा रंग तांबूस तपकिरी असतो , डोक्यावर इंग्रजी व्ही आकाराची खूण त्यामागोमाग संपूर्ण शरीरावर तपकिरी किंवा काळ्या रंगाचे जाडसर पट्टे असतात . यांच्या डोळ्यांची बाहुली गोल असते . यांचे वास्तव्य दगडांच्या ढिगाऱ्यात, वारुळांत, पडक्या घरामध्ये , किंवा झाडांच्या ढोलीत असते . यांचे खाद्य हे पाली , सरडे , सापसुरळ्या , उंदीर , लहान प्राण्यांची अंडी असे असते .

*11.खापरखवल्या साप Shieldtail snake :-


                             अतिशय दुर्मिळ असा हा खापरखवल्या जातीचा साप आहे .या सापाचा फीप्संस, एलोथ, मोठ्या खवल्याचा खापरखवल्या, महाबळेश्वरी खापरखवल्या अशा चार उपजाती आहेत. हा बिन विषारी असून हा पावसाळ्यात जास्त आढळतो.हा साप शांत आणि लाजाळू स्वभावाचा आहे . या सापाचा रंग तपकिरी जांभळा असतो त्यावर काळे आणि पिवळे ठिपके असतात . शरीर दंडगोल आकाराचे आणि शेपटीकडे तिरकी छाट असते . यांचे वास्तव्य जमिनीखाली असते . यांचे खाद्य गांडूळ आहे या सापाची एक विशिष्ठ प्रजाती महाबळेश्वर येथेही आढळून येते त्यास महाबळेश्वरी खापरखवल्या असे म्हणतात . महाबळेश्वरी खापरखवल्याचे शरीर काळ्या निळ्या रंगाचे आणि बाजुंनी नारंगी रेषा असतात .

*12.कवड्या Indian Wolf Snake :-


                           दिसायला मण्यार या विषारी साप सारखा असतो . परंतु कवड्या विषारी नाही . हा साप भिंतीवर, झाडावर चढण्यात पटाईत आहे . कवड्या खूपच चिडचिड्या वृत्तीचा साप आहे त्याला हाताळले असता तो चावा घेतो. या सापाचे शरीर गडद तपकिरी , काळसर किंवा लालसर तपकिरी रंगांचे असते , डोक्यामागे मानेवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा गडद जाड पत्ता असतो , शरीरावर पिवळे किंवा पांढरे आडवे पट्टे असतात जे शेपटीकडे फिकट होत जातात. यांचे वास्तव्य मनुष्य वस्तीजवळ आढळून येते . यांचे खाद्य पाली , सरडे आहेत .

*13.काळतोंड्या Dumeril’s black headed snake :-

                        हा दिसायला पोवळा (विषारी ) सापासारखा असतो. याला ओळखण्याची खूण म्हणजे शरीर तांबूस तपकिरी रंगाचे असते. डोके पूर्ण काळे , डोक्यापासून शेपटीपर्यंत छोट्या काळ्या ठिपक्यांची रांग असते. यांची वाढ अधिकतम एक ते सव्वा फूट इतकी होते . पालापाचोळा , लाकडाचे ओंडके , अशा जागी राहणे पसंत करतो. यांचे खाद्य छोटे साप , लहान पाली , सरडे , सापसुरळ्या इत्यादी.

*14.दिवड Checkered keelback snake :-


                         याला पाणघोणस असे सुद्धा नाव आहे . याची ओळख म्हणजे काळ्या , राखाडी , पिवळसर शरीरावर चौकटी नक्षी , डोळ्यामागे काळी तिरकी रेष . हा साप पाण्यात राहत असला तरी रात्री जमिनीवर राहणे पसंत करतो. नद्या , तलाव अशा ठिकाणी यांचे वास्तव्य असते त्यामुळे मासे व बेडूक हे यांचे भक्ष्य . हा साप बिनविषारी असला तरीही याचा चावा खूप वेदनादायी असतो .

*15.धूळनागीण Banded Racer :-


                       याला दक्षिण कोकणात नायकुळ, विदर्भात धूळनागीण, मराठवाड्यात गाव्हाल्या, गोव्यात नागिन तर गडचिरोलीत ताडजेरी अशा विविध नावांनी ओळखले जाते.हा साप अत्यंत चपळ असतो, म्हणूनच यास इंग्रजीत रेसर असे म्हटले जाते . साप रागात असल्यास नागाप्रमाणे शरीर करतो म्हणून यास नागीण असे म्हटले जाते परंतु सर्प पूर्णपणे बिनविषारी आहे. शरीर तपकिरी रंगाचे कधीकधी पांढऱ्या छटेचे सुद्धा आढळून येते , डोके टकदार चपटे , शेपूट लांब व निमुळती असते. हे साप अंडज आहेत . तसेच उंदीर , सरडे , पाली यांवर आपली उपजीविका करणारे असल्यामुळे मानवी वस्तीजवळ आढळून येतात .हे साप अंडज आहेत .यांची लांबी ४-५ फूट पर्यंत असते . उंदीर , सरडे , पाली यांवर आपली उपजीविका करणारे असल्यामुळे मानवी वस्तीजवळ आढळून येतात .

—————————————————————


वरील सर्व सर्प हे मानवापासून दूर राहणे पसंत करतात. चुकून धक्का लागून पाय पडला असता हे साप आपल्याला चावतात. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीस सर्प चावण्याचे प्रमाण हे अधिक दिसून येते. कारण या वातावरणात झालेल्या बदलामुळे साप नवीन जागांचा शोधात असतो; तसेच बर्‍याचशा सापांची; प्रामुख्याने घोणस सापाची मादी जून महिन्याच्या सुरुवातीस 45 ते 60 पिलांना जन्म देत असते. ही सर्व पिल्ली भक्ष्याच्या शोधात इतरत्र फिरत असतात. अशा वेळेस साप निघाण्याचे व शेतीच्या पेरणीची व इतर कामांची सुरुवात यामुळे या दिवसात सर्पचाव्याच्या दुर्घटनेचे प्रमाण अधिक आहे.

आपली संस्कृती ही शेतीप्रधान आहे. आपल्याला जे-जे उपयोगी पडतात, त्यांचे आपण आभार मानतो, त्यांचा गौरव करतो.

उदा. झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वटपौर्णिमा, बैलांसाठी बैलपोळा, साप उंदराचा नायनाट करतात व शेतकर्‍यांच्या पिकांचे संरक्षण करतात म्हणून सापांचा एक प्रतिनिधी म्हणून नागाची पूजा म्हणजेच नागपंचमी हा सण साजरा केला जातो.

परंतु जिवंत नागाची पूजा करणे हे धोक्याचे आहे. एक तर साप दूध पित नाही. प्यायला दिलेच तर ते त्याला विषासारखे आहे. दुसरी गोष्ट सापाच्या अंगावर आपण हळदी-कुंकू टाकतो. त्यामुळे कालांतराने त्याच्या अंगावरची स्किन गळायला लागते. त्यामुळे खर्‍या अर्थाने आपण प्रतीकात्मक जर पूजा करायची असेल तर मूर्तीची किंवा प्रतिमेची करावी. निसर्गातील प्रमुख घटकांना जीवदान द्यावे.

*सापांचे नैसर्गिक शत्रू : –

1) मुंगुस :- 

2) सर्पमार गरुड ( Short-toed snake eagle):-

*सर्प : समज व गैरसमज*

सापाबाबत बर्‍याचशा अंधश्रद्धा या ऐकीव, पुरातन काळापासून चालत आलेल्या; तसेच प्रसारमाध्यम, चित्रपट यातूनच जास्त पसरल्या आहेत. खरे तर अत्यंत शांत, खाणे-पिणे व झोप काढणे एवढंच माहीत असलेला साप आपण मोठ्या प्रमाणात बदनाम केला आहे. लक्षात ठेवणे, स्मरणात राहणे या गोष्टी सापाकडे बिलकुल नाहीत. त्यामुळे बदला घेणे हा प्रकार सापाच्या बाबतीत घडत नाही. मात्र चित्रपटांमुळे या अफवांचा जास्त प्रसार झाला आहे. शाळा, कॉलेज, खेड्यांमध्ये प्रसार करताना आलेले काही प्रश्न, समस्या, त्या त्या भागातल्या अंधश्रद्धा पाहू…

*1. साप डूक धरतो का?*

सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. त्यामुळे साप डूक धरणे व बदला घेणे. ही गोष्ट अशास्त्रीय आहे. भूक लागली असता भक्ष्य पकडणे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे या पलिकडे साप विचार करू शकत नाही. त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही म्हणजेच साप डूक धरत नाही.

*2. सर्पविषावर मंत्रपचार चालतो का?*

सर्पदंश झाल्यावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शन (ASVS) दिल्यानेच रुग्ण बरा होऊ शकतो. विषारी साप चावला असता कोणतेही मंत्रतंत्र, जाडीबुटीचे औषध, अंगारे-धुपारे, भस्म आयुर्वेदिक व तत्सम औषधे यांचा उपयोग होत नाही.

*3. रातराणी या वनस्पतीमुळे साप येतात का?*

रातराणी फुलांच्या सुगंधामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक, पाल, सरडे येतात. यांना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतात.

*4.सर्पदंश होऊ नये म्हणून रात्री शेतकरी काठी आपटत चालतात, ते का?*

काठी आपटल्याने उत्पन्न होणार्‍या ध्वनिलहरींची संवेदना सापांना जाणवते. ही संवेदना सुमारे 50 फूट अंतरावरून सापांना जाणवते. त्यामुळे वाटेत असलेला साप बाजूला निघून जाऊ शकतो. त्यामुळे आडवाटेत साप येणे किंवा सापावर पाय पडणे अशा घटना टाळू शकतो.

*5. मेलेल्या सापावर रॉकेल टाकले असता तो पुन्हा जिवंत होतो का?*

नुकत्याच मारलेल्या सापावर जर रॉकेल टाकले तर जखमेस प्रचंड वेदना होतात. त्यामुळे साप वळवळू लागतो. परंतु ही हालचाल काही क्षणापुरती असते. साप जिवंत होत नाही.

*6. साप दूध पितो का?*

सांप हा सत्तन प्राणी नाही..तो दूध पीत नाही..

सर्व साप हे मांसाहारी आहेत. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी आदी सापाचे अन्न आहे. साप दूध पित नाही. सापाला दूध पाजल्यास सापांच्या अन्ननलिका, श्वसनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

दूध हे सापांना विषासारखे आहे. गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेला ठेवतात, समोर दुधाची वाटी ठेवली असता, तो पाणी समजून पितो.

*7. नागमणी असतो हे खरे आहे का?*

कोणत्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो. गारुडी नागमणी म्हणून जे दाखवतात तो काचेचा, असबेस्टसचा खडा असतो.किंवा बैंझामीन चा खडा असतो.

*8. मुंगूस जखमी झाल्यास ते विशिष्ट झाडाचे मूळ खाऊन स्वतःचा बचाव करतात, हे खरे आहे काय?*

साप हे मुंगसाचे भक्ष्य आहे. त्यामुळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी मुंगूस अतिशय चपळतेने हल्ला करतो. त्यामुळे मुंगूस सहसा मरत नाही. तरीसुद्धा मुंगसाच्या शरीरावर वार केला नसलेल्या ठिकाणी (पाय किंवा तोंड, नाकाच्या शेंडा) नागाने चावा घेतल्यास मुंगूस मरू शकतो.

*9. मांडूळ सापाची किंमत (तस्करी) का केली जाते?*

जमिनीखाली आढळणारा अत्यंत शांत स्वभावाचा हा साप. शेपटीकडील बाजू ही तोंडासारखी आकाराने असते. त्यामुळे या सापाला ‘दुतोंड्या’ असेही म्हटले जाते. परंतु हल्ली या पंधरा वर्षांत मांत्रिक-तांत्रिक लोकांकडून या सापांना पकडून मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो. घरात ठेवल्याने धनलाभ होतो, तर बुटक्या माणसांची उंची वाढते. कॅन्सरवर रामबाण इलाज या अशा अफवांमुळे हा साप बदनाम झाला आहे. बर्‍याचदा तस्करी करताना हा साप पकडला आहे. परंतु रोखीने व्यवहार एकदाही झाला नाही. या सार्‍या अफवा आहेत.

*10. जुना किंवा देवाचा नाग असल्यास त्याच्या अंगावर केस असतात का?*

सरपटणार्‍या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, गारुडी किंवा मदारी लोक मेंढीच्या किंवा शेळीच्या शेपटीच्या केसांचा पुजका मोठ्या सुईमध्ये ओवून टाकतात आणि त्याला मिशीसारखा आकार प्राप्त होतो. काही दिवसांनी ही जखम भरल्यास केस घट्ट बसतात. आणि गारुडी लोक यालाच देवाचा नाग म्हणून लोकांना फसवतात.

*सापांबद्दलच्या अंधश्रद्धा कोणत्या?*

सापांबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

1) साप दूध पितो.

2) साप पुंगीच्या तालावर डोलतो

3) सापांना सुगंधाची आवड असते. तो केवड्याच्या बनात राहतो.

4) साप ‘डूक’ धरतो, त्याला चिडविणार्‍या किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीचा बदला घेतो.

5) साप काही वर्षांनी मानवी अवतार घेतात.

6) साप चावला असता उलटा होतो. त्यामुळे विष शरीरात जाते.

7) धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते

8) जुनाट सापांच्या शरीरावर केस असतात.

9) साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.

10) सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते.

11) नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.

12) हरणटोळ सर्प माणसाच्या डोक्यावर उडी मारून टाळू खातो.

13) अजगर माणसाला गिळतो.

14) गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात.

15) गरोदर स्त्रीने सापाला पाहिल्यास जन्मणारे मुलास जीभ चाटण्याची सवय लागते.

16) वापरलेले सॅनेटरी नॅपकीन जर सापाने खाल्लं तर गर्भ धरत नाही.

17) साप पकडणार्‍यांकडे मंत्र असतो.

18) सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो. या अशा अनेक अंधश्रद्धा सर्रास बोलल्या जातात.

*सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी?*

1.सर्वप्रथम हे लक्षात घेऊयात की, जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी हे असतील, तिथे साप हा हमखास येणारच. म्हणून आपणही दक्षता घेऊयात की, वरील कोणताही जीव आपल्या आसपास नसावा, जेणेकरून सापाचा व आपला मुकाबलाच होणार नाही.

2. बरेच दिवस पडलेले विटांचे ढीग, अडगळ या ठिकाणी हात घालताना पहिल्यांदा काठी जमिनीवर आपटावी, मगच हात घालावा.

3. शेतात रात्री-अपरात्री जाताना काठी आपटत चालावे. कारण सापांना आवाज नाही; पण जमिनीची कंपने जास्त लवकर जाणवतात व ते रस्ता सोडून दूर जातात.

4. अडगळीच्या ठिकाणी, शेतात किंवा जंगलभ्रमंती करताना नेहमी डोक्यावर टोपी आणि पायात बूट असायला हवेत

5.शेतातील घरात झोपण्याची वेळ आल्यास; नेहमी खोलीच्या मधोमध झोपावे, जमल्यास कॉटही मधोमध ठेवूनच झोपावे. कारण साप जर घरात आला तरी भिंतीच्या कडेनेच तो फिरत असतो.

6. घराबाहेरील रात्रीचा बल्ब हा नेहमी दरवाजा सोडून बसवावा. कारण जळता बल्ब हा रानातील किडे आकर्षित करतो व किड्यांना खायला पाल किंवा बेडूक व त्यांना खायला साप येण्याची शक्यता अधिक असते म्हणून बल्ब नेहमी कडेला बसवावा.

7. घरातील पाळीव पशु-पक्षी घरात न ठेवता काही अंतरावर सुरक्षित पिंजर्‍यात ठेवावेत.

*सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी* (प्रथमोपचार)


* रुग्णास कोणत्याही प्रकारची हालचाल करू देऊ नका.

* दंश झालेल्या ठिकाणी रुमालाने, दोरीने 3/4 रुंदीचे कापड किंवा शक्य झाल्यास ‘क्रेप बॅन्डेज’ने बोट किंवा पेन राहील, अशा अंतराने मध्यम दाब देत बांधावे.

* दंश झालेला भाग जंतुनाशकाच्या सहाय्याने स्वच्छ करावा.

* कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने जखम कापू नये/खराब करू नये.

* मानसिक संतुलनही स्थिर ठेवावे, जास्त चिंताजनक वातावरण करू नये.

* रुग्णास काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.

* विनाविलंब दवाखान्यात घेऊन जावे.

*सर्पदंशामुळे मनुष्य मृत्युमुखी पडण्याची प्रमुख कारणे*

* दंशाच्या ठिकाणाहून दवाखान्यापर्यंत पोचायला केलेला विलंब

* रुग्णामध्ये भीती निर्माण होणे.

* चुकीचे प्रथमोपचार – नस/शीर कापून घेणे.

* रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती (Immunity) कमी असणे.